प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर रोजी कट कारस्थान करून या तिघांनी स्वप्नाली यांना जाळून मारल्याची हादरवून टाकणारी माहिती पोलीस तपासात पुढे अली आहे.
माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत प्रकरणात शहर पोलिसांनी या 3 जणांना आज सकाळी अटक केली आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत एकमेकांचे फार पटत नव्हते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पण, या हत्येमागचं नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी महत्वपूर्ण तपास करत फार कोणतीही माहिती नसतानाही पोलिसांनी गेले 8 दिवस कसून तपास सुरु ठेवला होता. सतत गेले 8 दिवस मिऱ्या बंदर येथे जाऊन जागेवर जाऊन तपास केला . यामध्ये डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली होती. जाळून मारल्यानंतर ही राख या संशयित आरोपींनी समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रत्नागिरी शहर पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत या तपासात यश मिळवले आहे.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मिऱ्या येथील भाई सावंत यांच्या घरा जवळून पोलिसांनी राख आणली होती. ती तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्याचा आरोप रत्नागिरी शहर पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान, स्वप्नाली सावंत या दिनांक 1 सप्टेंबर पासून त्यांच्या मिऱ्या येथील घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच शहर पोलीस ठाण्यात केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण स्वामी आदी पोलिसांच्या पथकाने या तपासात मेहनत घेतली.

