सिंधुदुर्ग: अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 नूसार वर्तमानपत्रामध्ये भेळ, वडापाव, भजी यासारखे पदार्थ बांधून देण्यास बंदी करण्यात आली आहे. वर्तमानपत्र छपाईसाठी रासायनिक शाईचा वापर केला जातो. ही शाई माणसाच्या आरोग्यास घातक आहे. त्यामुळे असे केल्यास सदर व्यावसायिकावर अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 नूसार गुन्हा दाखल होणार आहे अशी माहीती अन्न व ऑषध प्रशासनाचे सहायक आयुक्त तु.ना. शिगाडे यांनी दिली आहे .
रासायनयुक्त शाई मानवी आरोग्यास धोकादायक व हानिकारक आहे. त्यामुळे अशा घातक रसायनयुक्त शाईने छापलेल्या वर्तमानपत्राचा कागदामध्ये गरम पदार्थ बांधून देणे ग्राहकांना धोकादायक ठरू शकते. त्याचबरोबर खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या हातगाडी, फरसाण उत्पादक, स्विट मार्ट धारक,मोठे हॉटेल्स, कॅटरर्स इत्यादी अन्न व्यावसायिकांनी देखील दोन ते तीन वेळा वापरलेले आणि काळे पडलेले खाद्यतेल हे पुन्हा अन्न पदार्थ तळण्यासाठी वापरु नये, असे काळे पडलेले तेल हे आरोग्यासाठी घातक असते. असे तेल हे इतरत्र फेकून पर्यावरणाची देखील हानी होते, त्यामुळे हे तेल फेकून न देता ते जमा करुन केंद्र शासन प्राधिकृत बायोडिझेल कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी यांना द्यायचे आहे.
या तेलाचा मोबदला बायोडिझेल उत्पादक कंपनीकडून सदर अन्न व्यावसायिकांना देण्यात येणार आहे. असे निर्देश केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झालेले आहेत. तरी सर्व अन्न व्यावसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावयायिक,स्नॅक्स सेंटर, स्वीट मार्ट, वडापाव,कॅटरर्स, फरसाण उत्पादक, भजी व भेळ विक्रेते इत्यादी अन्न व्यावसायिक यांना सूचित करण्यात येते की, वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्न पदार्थांचे पॅकिंग त्वरित बंद करावे तसेच दोन- तीनदा वापरलेल्या खाद्यतेलाचा अन्न पदार्थ तळण्यासाठी पुन्हा वापर करु नये. अन्यथा त्यांचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत योग्य ती कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग यांनी सांगितले आहे .