राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे .पण यावरून राजकर्त्यामध्ये वाद सुरु झाले आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.अशा प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचं आहे. या देशाला फक्त महात्मा गांधींजीचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेले आहे असे म्हणत याबाबत शरद पवारांनी लक्ष घालावे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ‘अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुरामची भूमिका साकारली आहे. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावे लागेल. गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षशरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण 2017 मध्येच झाले होते. तेव्हा मी सक्रीय राजकारणात नव्हतो. तसेच, आपण एखादी भूमिका साकारतो म्हणून ती भूमिका वैचारिक पातळीवर स्वीकारली असे होत नाही. काही वेळा आपण एखाद्या विचारांशी, भूमिकेशी सहमत नसतो. मात्र, त्या भूमिका आव्हानात्मक असतात. त्यामुळे कलाकार ती भूमिका करत असतो. मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्या भूमिकाचा संबंध राजकीय विचारांशी जोडू नये, असे अवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वांनाच केले आहे केले आहे.