ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार प्रा. दत्ताराम मारुती ऊर्फ द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकालाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
सत्यकथा-अभिरुची आदी नियतकालिकांतून घडणारी नवकथा, मध्यमवर्गांना रिझविणारी शहरी विनोदी कथा आणि नुकतीच घडू लागलेली ग्रामीणकथा या मराठी कथेच्या त्रिविध धारेत आपल्या कथेला आकार देऊन चावडीवरच्या चटकदार ग्राम्य विनोदाला साहित्यिक मूल्य प्राप्त करून दीले. त्यांची पहिलीच कथा ‘सत्यकथे’ने प्रसिद्ध केली. त्यानंतर पन्नास आणि साठ सालातील अग्रगण्य कथाकारांच्या पंगतीत त्यांचे नाव झळकूू लागले. त्यांच्या कथांवर आलेले चित्रपट गाजले. त्यांची भोकरवाडीची चावडी दूरदर्शनवरून सर्वदूर पसरली. ग्रामीण भागातील अस्सल इरसाल आणि अतरंगी व्यक्तिरेखांची फौज असलेल्या त्यांच्या कथा या कथाकथनाच्या कार्यक्रमांत वाचक डोक्यावर घेत.
गेल्या दीड वर्षापासून मिरासदार आजारी होते. पत्नीच्या निधनानंतर मिरासदार यांचे कन्या सुनेत्रा मंकणी आणि जावई, प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांच्याकडे वास्तव्य होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अन्न-पाणी घेणे सोडले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शुक्रवारी त्यांना घरी आणण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मिरासदार यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.