मुंबई- राज्यातील पोलिसपाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार आहेत. तसे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने काढले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील २७ हजार पोलिसपाटलांना संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रातील पोलिसपाटलांच्या मागण्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पोलिसपाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत पोलिसपाटलांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पोलिस पाटील यांना लढता येणार नाहीत. पोलीस पाटलांना किमान पंधरा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी, निवृत्तीची वयोमर्यादा साठ वर्षाहून ६५ वर्षे करणे,नूतनीकरण कायमचे बंद करणे,पोलीस पाटलांना अनुकंपा कायदा लागू करणे, कोरोनामध्ये मयत झालेल्या पोलीस पाटील यांच्या वारसांना ५० लाख रुपये विमा संरक्षण तात्काळ मिळावे या व अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीने गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. यात पोलिस पाटलांना सहकारी संस्थेमध्ये निवडणूक लढविण्यास मुभा द्यावी अशी मागणी संघटनेने वेळोवेळी प्राधान्यनाने केली होती.त्या मागणीला यश आले आहे.


