बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार

0
37

मानकापूर क्रीडासंकुलात काल आलेल्या ग्रामीण भागातील महिला केवळ कार्यक्रमासाठी नव्हे तर त्यांना जी आपण स्वप्न दाखवली आहे. त्याची उत्तरे शोधायला आणि संधी शोधायला आल्या होत्या. आता आमची जबाबदारी वाढली असून उद्योगउत्सुक असणाऱ्या ग्रामीण भागातील या महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा व तालुका स्तरावर मॉल व विक्री केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय , युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

मलकापूर क्रीडासंकुलात आज त्यांनी भेट दिली. त्यांच्या पुढाकारातून शुक्रवारपासून या ठिकाणी विभागीय सरस मेळावा व जिल्हास्तरीय महिला मेळावा सुरु झाला आहे. काल १२ हजार महिला मानकापूर क्रीडा संकुलात उद्योग, व्यवसाय उभारणी संदर्भातील मार्गदर्शन, यशकथा व प्रबोधन घ्यायला उपस्थित होत्या. कालच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कौतुक केले.

कालच्या मेळाव्यात आलेल्या महिलांनी एक जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याची ही उत्तम संधी असून जे प्रयोग बारामतीमध्ये सुनंदा पवार यांनी केले. तेच प्रयोग नागपूर ग्रामीणमध्ये करण्याची पार्श्‍वभूमी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रत्येक घरात असणारी महिला, सून, मुलगी आता सुशिक्षित आहे. आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सक्षम करण्याची तिची इच्छा आहे. तिने घेतलेले शिक्षण तिला वाया घालवायचे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था गतिशील करण्याची ही संधी समजून कामी लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बचत गटाचे, गृह उद्योगाचे आणि समूह उद्योगाचे स्वप्न घेऊन काल महिला या ठिकाणी आल्या होत्या. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था नीट करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल, अशी एक यंत्रणा तयार करावी लागेल ज्या मार्फत त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यातून त्यांना अर्थसाह्य होईल,त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असोत वा तालुक्याच्या ठिकाणी असोत या ठिकाणी विक्री केंद्र, छोटे मॉल उभे करावे लागतील. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढे यावे, यासाठी लवकरच अशा पद्धतीची यंत्रणा उभी करणे आवश्यक असून नागपुर जिल्हा परिषदेने हा आदर्श पुढे करावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज याठिकाणी दिले.

तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या वतीने सुनील केदार यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे, सभापती तापेश्वर पुंडलिक वैद्य, सभापती उज्वला बापू बोढारे, जिप सदस्य अवंतिका लेकुरवाळे, कुंदा राऊत, रवींद्र भोयर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विवेक इलमे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here