मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्री.श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त हाती आले आहे. पाटणकर यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.ही कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट अंतर्गत करण्यात आली आहे.ईडीने यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना वेगवेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
आतापर्यंतच्या ईडीच्या कारवाया केवळ महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर होत होत्या. मात्र आता थेट ठाकरे कुटुंबियांवर ही करावाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. सरकारमधील हालचालींना प्रचंड वेग आला आहे.केंद्रीय तपास यंत्रना सूडबुद्धीने कारवाया करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने अलीकडेच केला होता.
मुख्यामंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे “मालक आणि नियंत्रक असल्याचे इडीने म्हटले आहे. या कारवाईत या सदनिकांसह अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये किमतीची मालमत्तां जप्त करण्यात आल्याची माहिती इडीने दिली आहे. मुंबईजवळील ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 निवासी सदनिका जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी केला आहे.
ईडीच्या या कारवाईबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनातून तात्काळ मातोश्री निवासस्थानाकडे निघाले. मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत रवाना झाले. त्यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.त्यामुळे आता सत्ताधारी पक्षा यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.