मुंबई – देशभरातच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील वाढते वाहन अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघनाला आळा बसावा यासाठी परिवहन विभागाने नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांना अटकाव करण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास बाईकस्वारांना एक हजार रुपये, चारचाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. त्याशिवाय जर पुढील तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही पुन्हा गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर धोकादायकरित्या वाहन चालविल्यास चारचाकी चालकाला तीन हजार रुपये तर अन्य वाहन चालकांना चार हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तीन वर्षात पुन्हा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार असून, रिफ्लेक्टर नसणे, फॅन्सी नंबर प्लेट इत्यादीसाठी एक हजार रुपये दंड आकारला जाईल.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला असून त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे. सध्या राज्यात वाहतूक नियमनाचे पालन कोणीही काटेकोरपणे करताना दिसत असून प्रत्येकाकडून थोड्या फार प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. ज्यामुळे राज्यातील अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


