राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
72

महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम  आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सन २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओद्वारे आभारपर मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ कोल्हापूर व तालसंदे आकुर्डी पुणेचे कुलगुरू डॉ.संजय पाटील, नवी दिल्ली एआयसीटीई या संस्थेचे सदस्य डॉ.देविप्रसाद शर्मा, कोलकाता येथील एनटीटीआर या संस्थेचे संचालक प्रा.राजीव कुमार, कानपूर येथील एचव्हीटीयू विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.ओमकार सिंग, म्हैसूर येथील व्हीजेटीआर येथील शास्त्रज्ञ डॉ.फारूक काझी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी देशातील उत्कृष्ट कुलगरु तसेच इंजिनीयरींग महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी आपल्याला निसर्गातून अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या राज्याला नक्कीच पुढे नेवूया. राज्यात नव्याने होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. आगामी काळातील कला विद्यापीठ राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे, असे मतही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले, जैव विविधतेचे जतन, संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या पिकांपासून आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला  पाहिजे. त्यासाठी आपल्याला या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. आपल्या देशातही ज्ञानवंत आहेत. त्यांनाही योग्य अशा गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागतील. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयएसटीईचे नेतृत्व कोल्हापुराकडे आहे. ज्या भूमीत छत्रपती शाहू महाराजांनी समानता, सक्षमतेचा आणि शिक्षणाचा पाया रचला,त्या भूमीकडे हे नेतृत्व आहे, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हत्तीशी संवाद साधणाऱ्या श्री.आनंद शिंदे दांम्पत्यांची कालच भेट झाल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्याला सृष्टीतील प्रत्येक गोष्टींशी संवाद साधता आला पाहिजे. श्री.शिंदे यांनी माहिती दिल्यानुसार हत्तींना त्सुनामीची चाहूल लागते आणि तीही दोनशे-अडीचशे किलोमीटर्सवर अंतरावर. त्यांच्याकडे कुठले तंत्रज्ञान आहे. हत्तीने पाय आपटला तर त्याच्या कंपनातून सात किलोमीटर्सवरील हत्तीला संदेश मिळतो. त्यामुळे आपण निसर्गाच्या पुढे पोहोचलो, असे कसे म्हणायचे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here