: नरडवे प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपुर्ण प्रकल्प असून हा प्रकल्प तातडीने पुर्ण होण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय विभागांनी गतीने कामे करावीत. तसेच नरडवे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नरडवे प्रकल्प आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जलसंपदा विभागाचे अभियंता श्री. थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तसेच नरडवे ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेला हा प्रकल्प पुर्णत्वास यावा यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरु आहेत. नरडवे प्रकल्प हा राज्यामध्ये असा एकमेव प्रकल्प आहे ज्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा एक मोठा प्रकल्प असून हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यास जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात याचा लाभ होणार आहे. सदरच्या प्रकल्पासाठी रस्त्याचे काम संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरु करावे. तसेच मदतीसाठी २९९ ची यादी तातडीने तयार करावीत तसेच ६५ टक्के न भरलेली रक्कम यांचीही यादी तातडीने प्रशासनाने ग्रामस्थांना सोबत घेऊन तयार करावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तसेच नरडवे गावासाठी देण्यात येणाऱ्या पर्यांही मार्गाचे तातडीने डांबरीकरणही करावे. यासाठी ग्रामस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


