धुळे- शहरातील डॉ. आशिष पाटील यांनी जटिल शस्त्रक्रियेच्या आधारे आदिवासी शेतकर्याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला. डॉ. पाटील यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा पहिल्यांदाच काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आदिवासी शेतकर्याचे प्राण वाचले.
या संदर्भात माहिती देताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील पन्नास वर्षीय शेतकरी रमण चौरे यांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार लघवीचा त्रास होत होता. तपासणी अहवालामध्ये रुग्णाच्या ब्लॅडरमध्ये मोठा खडा असल्याचे लक्षात आल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करीत असताना हा खडा ब्लॅडरच्या हाडांमध्ये रुतून बसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा खडा त्या हाडातून बाहेर काढताना 20 ते 25 मिनिटे आमचे वैद्यकीय कसब पणाला लागले होते. चौरे यांची सखोल आरोग्य तपासणी केली असता, त्यांना मूतखड्यामुळे अन्य कोणताही गंभीर आजार झाला नसल्याची बाब डॉ. पाटील यांनी स्पष्ट केली.
चौरे यांच्या मूत्राशयातून काढण्यात आलेल्या मूतखड्याचा आकार 12.5 बाय 12.75 सेंटीमीटर असून, हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा मूतखडा असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे.


