मुंबई– गेले दोन महिन्यांमध्ये गद्दार आणि खोके हे दोनच शब्द ऐकावत आहात. गद्दारी झाली आहे; पण गद्दारी झाली ती २०१९ मध्ये झाली. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले. खरे गद्दार कोण हे आता जनतेला कळाले आहे. शिवसेना ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेना ही अनेकांच्या घामातून निर्माण झालेली संघटना आहे. तुम्हाला ही तुमच्या दावणीला बांधता येणार नाही. आम्ही जनतेसाठी उठाव केला, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपसह सत्तांतर घडवले. गेले चार महिने हे दोन्ही गट एकमेकांवर सतत तुटून पडत असताना आता दसरा मेळाव्यातील भाषणात कोणती नवी हत्यारे उपसली जातात, याबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
आम्हाला गेल्या दोन महिन्यांमध्ये गद्दार आणि खोके हे दोन शब्द ऐकावत आहोत. गद्दारी झाली आहे; पण गद्दारी झाली ती २०१९ मध्ये झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली. शिवसेनेला मते दिलेल्यांशी तुम्ही गद्दारी केली. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकारे यांचा फोटाे वापरलात. युती म्हणून निवडणूक लढवली आणि निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुम्ही विकलात. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही भरकटला. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. शिवतीर्थावर जावून बाळासाहेब ठाकरे यांची प्रथम माफी मागा. मगच आमच्यावर बोला, असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्ही गद्दारी नाही तर क्रांती केली आहे, असेही ते म्हणाले.
तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकले. खरे गद्दार कोण हे आता जनतेला कळाले आहे. आज या दसरा मेळाव्याला झालेली गर्दी पाहा. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कायम आहोत. तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात. तुम्ही हिंदुत्त्ववादी राजकारणाची चूक केली, असे विधान तुम्ही विधानसभेत केले. हे विधान तुम्ही करताना तुम्हाला काहीच वाटले नाही का, असा सवालही त्यांनी केला.
मविआ सरकार बनत होते तेव्हा अनेक आमदार सांगत होते की, ही आघाडी महाराष्ट्राचे अधोगती करणारी आहे. त्यावेळी आम्ही अन्याय सहन करत तुमचा निर्णय मान्य केला. मात्र जेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा विचार सोडला तेव्हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला. आम्ही जनतेसाठी उठाव केला, असेही शिंदे म्हणाले.
तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्रीपद टिकविण्यासाठी शिवसेनेचे पानिपत केले. गेली अडीच वर्षांची खदखद होत होती. तुम्हाला आम्ही आमची व्यथा सांगितली. मात्र तुम्ही दुर्लक्ष केले. तुम्हाला ५० आमदारांनी का सोडले, १२ खासदारांनी तुमची साथ का सोडली. यापूर्वी राज ठाकरे, नारायण राणे यांनीही तुम्हाला सोडले होते. तुम्ही आत्मपरिक्षण करा, असे आवाहनही त्यांनी केली.
एकनाथ शिंदे हा दिवसरात्र जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही आज म्हणताय, निवडणुकीला सामोरे जा. मात्र २०१९ ला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करताना राजीनामा का दिले नाही, असा सवाल करत तुम्ही गेल्या अडीच वर्षांत केवळ अडीच तास मंत्रालयात गेला. कोरोनाच्या नावाखाली सर्वांना घरात डांबले, मात्र तुमची दुकाने सुरु होती, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.
तुम्ही मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी विचारांशी गद्दारी केली. सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीच्या अजेंडा असा मंत्रालयात कारभार होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाले तरी तुम्ही मुख्यमंत्रीपद टिकविण्यासाठी सर्व तडजोडी स्वीकारल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाईट वाटेल म्हणून तुम्ही ‘पीएफआय’ कारवाई झाले तरी तुम्ही का बोलला नाही, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.
राज्यातील कानाकोपर्यांतून शिवसैनिक आजच्या विराटसभेला उपस्थित राहिले. यामुळेच मी आज तुमच्यासमोर नतमस्तक झालो. मी मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातीलच एक कार्यकर्ता आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेला हा पार्ठिबा असल्याचा हा पुरावा आहे. येथे अनाथ जनसागर उसळला आहे. खरी शिवसेना कोठे आहे, याचे उत्तर उपस्थित महासागरानेच दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार कोठे आहेत, या प्रश्नाचे उत्तरही या गर्दीने सिद्ध केले आहे, असेही शिंदे म्हणाले.
तुम्ही न्यायालयात जावून शिवाजी पार्क मैदान मिळवले. मी कधीच यामध्ये हस्तक्षेप केला नाही. मैदानही आम्हाला मिळालं असते. परंतू या राज्याचा मुख्यमंत्री म्हणुन कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मैदान जरी तुम्हाला मिळाले तरी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्याबरोबर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाच तिलांजली दिली. तुम्हाला त्या मैदानावर उभे राहून बोलण्याचा अधिकार आहे का. तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. तुम्ही या दोन पक्षांच्या तालावर चालत होता. युती सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंकडे होता. मात्रा मविआ सरकारचा रिमोट कंट्रोल हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होता, असा आरोपही त्यांनी केला.
संपूर्ण राज्यातून आमच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही जे केले ते उघडपणे राज्याच्या हितासाठी आणि शिवसेनेसाठी केले. ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांची आणि सर्व शिवसैनिकांची आहे. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्त्व महत्त्वाचे आहे. सत्तेसाठी आम्ही लाचार झालो नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार हे शिवसैनिक आहे. वारसा हा विचारांचा असतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा जपला आहे, असेही त्यांनी ठणकावले.
‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर काहींनी ‘आरएसएस’वर बंदी घ्याला, अशी मागणी केली. ही मागणीच हास्यास्पद आहे. आरएसएस ही प्रखर राष्ट्रप्रेमी संघटना आहे. या संघटनेचे कार्य मोठे आहे, असेही ते म्हणाले.


