
अकोला, दि. ९ नोव्हेंबर : शेतीसमोरील गंभीर समस्यांचा वेध घेण्यासाठी ‘किसान ब्रिगेड’तर्फे आयोजित ‘शेतकरी संवाद मेळावा’ आज अकोल्यात पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न, शासनाची भूमिका आणि कृषी क्षेत्रातील नवीन संधी या विषयांवर थेट संवाद साधण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. विशेषतः कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका, राज्यात सुरू असलेली शेतकरी आंदोलनं, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून शेतीत येणारे बदल यावर सखोल मांडणी करण्यात आली. तसेच सेंद्रिय, नैसर्गिक आणि जैविक शेती या क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्यावर भर देण्यात आला.
मेळाव्यात शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला. यावेळी प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.
या प्रसंगी श्री. प्रकाश पोहरे यांच्या ‘शेतकरी लूटवापसी’ या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
कार्यक्रमात किसान ब्रिगेडचे अध्यक्ष श्री. प्रकाश पोहरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, माजी मंत्री अनिल देशमुख, ऍड. साहेबराव मोरे, कृपाल (त्यात्या) भैय्यासाहेब देशमुख, हर्षवर्धन देशमुख, अझहर हुसेन, महादेव भुईभार, लक्ष्मणराव तायडे, शरद तसरे, रमेश बंग, संग्राम गावंडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या संवाद मेळाव्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना योग्य दिशादर्शन मिळाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्पही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

