रायगड: रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. अकोल्याहून सहलीसाठी आलेल्या इयत्ता बारावीतील दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून, एक विद्यार्थी थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका शाळेतील १२ विद्यार्थी आणि तीन शिक्षक सहलीसाठी काशीद येथे आले होते. समुद्रकिनारी पोहण्यासाठी काही विद्यार्थी पाण्यात उतरले असता, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीन विद्यार्थी बुडाले. काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरु झाला. स्थानिकांनी आणि इतर सहकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले, मात्र दोन विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आयुष रामटेके आणि राम खुटे अशी आहेत, तर आयुष बोबडे हा विद्यार्थी थोडक्यात बचावला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
सहलीच्या हंगामाची सुरुवातच अशा दुर्दैवी घटनेने झाली असल्याने परिसरात आणि शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. पालक आणि शिक्षकांमध्येही या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तरुणाईच्या आनंदाला काळाने ग्रासले, अशी भावना व्यक्त करत अनेकांनी या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.


