मुंबई: रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कर्करोग, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे.
हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक शेतीलाच प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
‘संकल्प फाउंडेशन’ या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी ‘नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर राजभवन, मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतांची आवक थांबवली पाहिजे या खतांमुळे गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहेत. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.


