सिंधुदुर्ग जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर
जिल्हा परिषदेत भाजप 31, शिवसेना 19; पंचायत समितीत भाजप 63, शिवसेना 37 जागा
निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा अंतिम जागावाटप फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र येत जिल्ह्यातील सत्ताकेंद्रावर आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत हा फॉर्म्युला जाहीर होताच, सिंधुदुर्गच्या राजकारणात निवडणूक वातावरण तापले आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याची अधिकृत घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या एकूण 50 जागांपैकी 31 जागा भाजप तर 19 जागा शिवसेना (शिंदे गट) लढवणार आहे. पंचायत समितीच्या 100 जागांपैकी 63 जागा भाजप आणि 37 जागा शिवसेना (शिंदे गट) लढवेल, असे स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. राणे यांनी सांगितले की, भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती या निवडणुका एकत्रितपणे लढवणार असून, ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जि.प.–पं.स. निवडणुकांत महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नसून सर्व निर्णय एकमताने झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा मतदारसंघनिहाय जागावाटप जाहीर करताना सांगण्यात आले की,
-
सावंतवाडी मतदारसंघात भाजप जि.प. 11 व पं.स. 17; शिवसेना जि.प. 6 व पं.स. 17 जागा लढवणार आहे.
-
कुडाळ–मालवण मतदारसंघात भाजप जि.प. 4 व पं.स. 17; शिवसेना जि.प. 11 व पं.स. 15 जागा लढवणार आहे.
-
कणकवली मतदारसंघात भाजप जि.प. 16 व पं.स. 31; शिवसेना जि.प. 2 व पं.स. 5 जागा लढवेल.
रत्नागिरी जिल्ह्यातही महायुती झाल्याची माहिती देत, मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी भेट घेतल्याचे खा. राणे यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल आणि महायुतीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.


