चिपळूणमध्ये जि.प.–पं.स.निवडणुकीत तिरंगी लढत
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे चिपळूण तालुक्यात शिवसेना–भाजप युती, राष्ट्रवादी आणि उबाठा सेना अशी तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. जि.प.च्या ९ जागांसाठी २८, तर पं.स.च्या १८ जागांसाठी ५५ असे एकूण ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुक्यातील २७ जागांसाठी भाजप १०, शिंदे गटाची शिवसेना १८,
राष्ट्रवादी काँग्रेस २८ आणि ठाकरे गटाची शिवसेना (उबाठा) २२ जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर, तर बसपा व वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत.
या निवडणुकीत उबाठा सेनेसमोर उमेदवार उभे
करण्यात अडचणी आल्याचे चित्र दिसून येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भागात सर्वच जागांवर उमेदवार दिले असले, तरी चिपळूण तालुक्याच्या निम्म्या भागात पक्षाला उमेदवार उभे करता आले नाहीत. विशेष म्हणजे शिरगांव गट व गण तसेच पिंपळी खुर्द गणातील उबाठा सेनेच्या तीनही अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पक्षाचा एकही उमेदवार उरलेला नाही.
दरम्यान, शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने कोकरे गटातून किशोर घाग यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता;अर्ज मागे घेतला. तर उमरोली गट भाजपकडे सोडल्याने नाराज झालेले शिवसेनेचे योगेश खांडेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला असून, त्यामुळे उमरोली गटात भाजपची डोकेदुखी वाढली आहे.अर्ज माघारी-नंतरचे चित्र पाहता चिपळूण तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणूक चुरशीची , रंगतदार ठरण्याची चिन्हे असून, प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्यांमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.तिरंगी लढतीमुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


