देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवला – राहुल गांधी
नवी दिल्ली :
दीर्घकाळ चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभागृहात केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापारी करारावरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. मोदी सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवला आहे असा खळबळजनक आरोप करत राहुल गांधींनी संसदेत वादळ निर्माण केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही खडे बोल सुनावले.
ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा मोदी सरकारने परकीयांच्या हाती सोपवला आहे असा घणाघाती आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधा-यांना निरुत्तर केले. राहुल गांधींनी आपल्या भाषणात डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर दिला. ते म्हणाले, अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेत आज सर्वात मौल्यवान काय असेल, तर तो भारतीयांचा डेटा आहे. अमेरिकेला जर त्यांचे डॉलरचे वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना भारतीय डेटाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारने या ट्रेड डीलमध्ये आपल्या डेटावरील नियंत्रण सोडून दिले आहे. अमेरिकेमध्ये फ्री डेटा फ्लो आणि डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणून सरकारने देशाचे नुकसान केले आहे.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संदेश दिला. “जर इंडिया आघाडीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असती, तर आम्ही स्पष्ट केले असते की, आम्ही तुमचे मित्र आहोत, पण नोकर नाही. आम्ही त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोललो असतो. ट्रम्प यांना जर भारतीय डेटाचा अॅक्सेस हवा असेल, तर त्यांनी आमच्याशी सन्मानाने वागले पाहिजे असे राहुल गांधी ठणकावून म्हणाले.


