छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा
मुंबई l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांना UNESCOने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा बहाल केला असून, त्यासंदर्भातील अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे युनेस्को कार्यालयात जाऊन स्वीकारले.
दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर ११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या ४७ व्या अधिवेशनात ‘मराठा ‘मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र मंत्री शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पॅरिस येथे स्वीकारले.
फेब्रुवारी २०२५ मध्ये मंत्री शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिस येथे जाऊन युनेस्कोसमोर तांत्रिक व धोरणात्मक सादरीकरण करत मानांकनासाठी प्रभावी युक्तिवाद केला होता. त्या प्रयत्नांना यश मिळत आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे.
जागतिक वारसा दर्जा मिळालेल्या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह “ जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणांशी लढा देत उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी ही भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व प्रशासकीय व्यवस्थेचा नमुना मानली जाते. या किल्ल्यांद्वारे सुरक्षित शासनव्यवस्था, लोककल्याण आणि सशक्त संरक्षण व्यवस्था उभी करण्यात आली होती.
मानांकन स्वीकारताना मंत्री शेलार यांनी हा क्षण महाराष्ट्र, देश आणि शिवप्रेमींसाठी गौरवाचा असल्याचे सांगितले. या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री ॲड. शेलार यांनी आभार मानले आहेत.
पान ४ वर


