‘सिग्नल शाळे’ चे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते संपन्न
मुंबईत तीन ठिकाणी उड्डाण पुलाखाली ‘सिग्नल शाळे’ चे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
‘आपली मुंबई’ ही स्वप्नांची नगरी आहे, पण याच शहरात सिग्नलवर उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणारी अनेक चिमुकली मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात.
या वंचित आणि भटक्या मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी ‘शाळाच मुलांच्या उंबरठ्यापर्यंत’ नेण्याचा आमचा हा एक ऐतिहासिक आणि संवेदनशील प्रयत्न आहे.
आज चेंबूर येथील अमर महाल येथे, सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्ग उड्डाणपुलाखाली ‘सिग्नल शाळे’ चे लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झाले.
मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय अर्थसहाय्यित, बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत आणि समर्थ भारत व्यासपीठ संचालित या अभिनव उपक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना मला विशेष समाधान वाटत आहे.
ठाणे आणि नेरूळमध्ये यशस्वी ठरलेली ही संकल्पना आता आपल्या मुंबईत साकारली आहे. हा सोहळा केवळ एका शाळेचे उद्घाटन नसून, तो मुंबईतील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान हक्क मिळवून देण्याच्या आमच्या ध्येयाचा एक भाग आहे. डिजिटल क्लासरूम आणि फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून या मुलांच्या पंखांना आता शिक्षणाचे नवे बळ मिळेल.
याप्रसंगी एम-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती आशा मराठे, नगरसेविका श्रीमती कशीश फुलवारिया, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त श्री. शंकर भोसले, उपशिक्षणाधिकारी श्री. मुख्तार शाह, समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे श्री. अजय जोशी व श्री. भटू सावंत, आदिवासी पारधी महासंघाचे श्री. संतोष पवार यांच्यासह विविध मान्यवर, स्थानिक नागरिक आणि माझे बालमित्र (विद्यार्थी) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षणापासून कोणताही मूल वंचित राहू नये” हाच आमचा ध्यास आहे. अशा विधायक उपक्रमांच्या माध्यमातून आपण अधिक सक्षम, सुशिक्षित आणि प्रगत मुंबई नक्कीच घडवूया, असा मला ठाम विश्वास आहे.


