रेल्वे तिकीट रद्दीकरण नियमांत मोठा बदल
आता ७२, २४ आणि ८ तासांची नवी मर्यादा
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे, भारतीय रेल्वेने तिकीट रद्दीकरणाच्या नियमांत मोठा बदल केला आहे. यापूर्वी प्रवासाच्या वेळेपूर्वी असलेल्या ४८, १२ आणि ४ तासांच्या कालमर्यादा आता बदलून ७२, २४ आणि ८ तास अशा करण्यात आल्या आहेत. आरक्षण तक्ते पूर्वीच्या तुलनेत अधिक आधी तयार केले जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, आरक्षण तक्ते (Reservation Charts) आता प्रवासाच्या केवळ ४ तास आधी न तयार करता ९ ते १८ तास आधीच तयार केले जात आहेत. त्यामुळे तिकीट रद्दीकरणाच्या जुन्या मर्यादा व्यवहार्य राहिल्या नव्हत्या. त्यानुसार आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमानुसार, प्रवासाच्या ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास केवळ किमान रद्दीकरण शुल्क आकारले जाईल, तर ७२ ते २४ तासांच्या दरम्यान रद्द केल्यास भाड्यातून २५ टक्के कपात होईल. तसेच २४ ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास ५० टक्के कपात केली जाईल. प्रवासाच्या ८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही, असेही नव्या नियमांत नमूद करण्यात आले आहे.
रेल्वेच्या या निर्णयाचा परिणाम विशेषतः शेवटच्या क्षणी प्रवास रद्द करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. दुसरीकडे, प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षणाची स्थिती लवकर स्पष्ट होण्यास मदत होणार असून प्रवासाचे पर्यायी नियोजन करणे सोपे जाणार आहे, असे रेल्वेचे म्हणणे आहे.


