शौर्य पुरस्कार विजेत्यांसाठी मोठी घोषणा; रेल्वेत आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा
नवी दिल्ली : देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना सन्मान देत भारत सरकार ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार, ‘सेना / नौसेना / वायुसेना पदक’ प्राप्त शौर्य पुरस्कार विजेते तसेच त्यांच्या कुटुंबियांना भारतीय रेल्वेत आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ शौर्य पुरस्कार मानकऱ्यांसोबतच त्यांच्या जोडीदारांना (पुनर्विवाह होईपर्यंत विधवा किंवा विधुर) मिळणार आहे. तसेच मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालेल्या अविवाहित सैनिकांच्या पालकांनाही ही सवलत लागू राहणार आहे.
या अंतर्गत लाभार्थ्यांना भारतीय रेल्वे च्या गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी (First Class), २-टायर वातानुकूलित (2 AC) आणि वातानुकूलित खुर्चीयान (AC Chair Car) या श्रेणींमध्ये एका सहप्रवाशासह आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे.
या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि शौर्य दाखवणाऱ्या जवानांचा सन्मान अधिक वृद्धिंगत होणार असून, त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


