नवी दिल्लीत पहिल्या अखिल भारतीय प्रशासकीय महिला मराठी साहित्य संमेलनाचा समारोप उत्साहात
नवी दिल्ली (प्रतिनिधी): नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन आणि ‘सरहद’ संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय पहिल्या अखिल भारतीय प्रशासकीय महिला मराठी साहित्य संमेलनाचा समारोप विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी प्रशासनातील अनुभवांचे संचित केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रशासनातील संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
या संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा तथा निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे, स्वागताध्यक्षा तथा सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी, संमेलनाच्या निमंत्रक तथा महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, मुख्य संयोजक सुषमा संजय नहार, कार्यवाह श्रीमती पगारिया तसेच सहसंयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.
या दोन दिवसीय संमेलनात देशभरातील प्रशासकीय सेवेत कार्यरत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध विषयांवर चर्चा, अनुभवकथन आणि साहित्य सादरीकरणाच्या माध्यमातून संमेलनाला विशेष रंगत आली.


