अत्याचारातून उभी राहिली सविता प्रधान; पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होऊन IAS बनण्याचा पराक्रम
भोपाळ (प्रतिनिधी): कठीण परिस्थिती, गरिबी आणि कौटुंबिक अत्याचार यांना न जुमानता सविता प्रधान यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नागरी सेवा परीक्षेत यश मिळवत IAS अधिकारी बनण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने देशभरातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
मध्य प्रदेशातील आदिवासी समाजातील सविता प्रधान यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. अवघ्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतरही त्यांना पती व सासरच्या मंडळींकडून सतत अत्याचार, अपमान आणि उपेक्षेचा सामना करावा लागला. दोन लहान मुलांचा सांभाळ करत असतानाच त्यांनी हे सर्व सहन केले.
सविताने सांगितले की, अनेक वेळा मुलांसमोरच तिच्यावर मारहाण केली जात होती. या कठीण प्रसंगांमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती आणि एका टप्प्यावर जीवन संपवण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. मात्र, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्धार करत तिने अत्याचारपूर्ण नाते तोडले आणि स्वतःचे आयुष्य नव्याने घडवण्याचा निर्णय घेतला.
उदरनिर्वाहासाठी सविताने सलूनमध्ये काम केले, तसेच शिकवण्या घेत अभ्यास सुरू ठेवला. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने नागरी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनण्याचा मान मिळवला.
आज सविता प्रधान यांची यशोगाथा देशभरातील हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अत्याचार, गरिबी आणि नैराश्याशी झुंज देणाऱ्या महिलांसाठी त्यांची कहाणी आशेचा किरण ठरत असून ‘परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर यश मिळवता येते’ हा संदेश त्यांनी दिला आहे.


