नवी मुंबई विमानतळ नामांतरावर संभ्रम दूर; “दि. बा. पाटील यांचंच नाव होणार” – अतुल पाटील
नवी मुंबई विमानतळ नामांतरावर संभ्रम दूर; “दि. बा. पाटील यांचंच नाव होणार” – अतुल पाटील
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या नामांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर भूमिपुत्रांमध्ये संभ्रम आणि नाराजीची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी समोर येत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अतुल पाटील यांनी सांगितले की, विमानतळाच्या नामांतराची प्रक्रिया ही न्यायालयीन नसून पूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची आहे. राज्य सरकारकडून संबंधित ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून तो सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या चर्चांवर विश्वास न ठेवता नामांतराच्या लढ्यात एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्र संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अतुल पाटील यांच्या वक्तव्यामुळे समर्थकांमध्ये पुन्हा आशावाद निर्माण झाला आहे.