मुंबई — ज्येष्ठ आणि ख्यातनाम पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक देदिप्यमान सुवर्ण पर्व संपले आहे. स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.”
मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील असंख्य गाण्यांमधून सुमन कल्याणपूर यांनी आपल्या सुरेल आणि मधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले असून संगीत क्षेत्रात त्यांनी अजरामर ठसा उमटवला आहे.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, “त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले. साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.”
सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राने एक अमूल्य रत्न गमावले असून त्यांच्या स्वरांचा वारसा कायम संगीतप्रेमींच्या स्मरणात राहील, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.