रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणूक : सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे वैध
४ जून माघारीचा अंतिम दिवस
रत्नागिरी — महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सहाही उमेदवारांची एकूण १२ नामनिर्देशन पत्रे छाननीअंती वैध ठरली आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार, ४ जून असून त्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
३० मे रोजी अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी चार, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी एक, मानसी संतोष म्हात्रे यांनी एक, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी एक तसेच अनिकेत सुनील तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी चार नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. अशा प्रकारे एकूण सहा उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती.
मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची माहिती देत संबंधितांना आक्षेप नोंदविण्याची संधी दिली.
छाननी प्रक्रियेनंतर सर्व १२ नामनिर्देशन पत्रे वैध ठरविण्यात आली. दरम्यान, मानसी संतोष म्हात्रे यांचे नामनिर्देशन पत्र हे अपक्ष उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, विविध उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


