दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत १५ जूनपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीसाठी पोषक ठरणार नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी वादळी पावसाच्या आधारे पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि उच्चदाब विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.