'दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही; त्यांचा विकासाचा वारसा जपत राहीन' – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
‘दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही; त्यांचा विकासाचा वारसा जपत राहीन’ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे, दि. २८ : आदरणीय ‘दादा’ यांच्या निधनाला पाच महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी त्यांनी दादांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा आणि विकासाच्या वारशाचा मार्ग आयुष्यभर जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “प्रत्येक भेटीत मन पुन्हा एकदा भरून येते. काळ पुढे सरकत असला, तरी तुमची उणीव आजही प्रत्येक क्षणी जाणवते. ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “जनतेसाठी जगण्याचा तुमचा विचार, विकासाची तुमची दूरदृष्टी आणि माणसांशी जपलेले तुमचे आत्मीय नाते हीच माझी प्रेरणा आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत, तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत तुमचा विकासाचा वारसा मी आयुष्यभर जपत राहीन. हीच तुमच्याप्रती माझी खरी कृतज्ञता आणि आदरांजली.”
“तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहू देत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत दादांना विनम्र अभिवादन केले.