नवी मुंबई, दि. २९ : नवी मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा केवळ ९ टक्क्यांवर आल्याने पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने पाणी बचतीचे उपाय अवलंबावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने सोसायट्या, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पाणी बचतीसाठी महत्त्वाच्या सूचना :
सोसायटीतील स्विमिंग पूल काही काळासाठी बंद ठेवावेत.
गाड्या धुण्यासाठी पाईपचा वापर टाळावा आणि आवश्यक असल्यास बादलीचा वापर करावा.
शॉवरऐवजी बादलीने आंघोळ करून पाण्याची बचत करावी.
स्वयंपाकघरातील वापरलेले (योग्य असे) पाणी झाडांना वापरावे.
नागरिकांनी प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून पाणी वापरात काटकसर केल्यास संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यास मदत होईल. स्थानिक प्रशासनाकडूनही आवश्यकतेनुसार पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना जारी केल्या जाण्याची शक्यता आहे.