अंमली पदार्थमुक्त समाजासाठी ठाणे पोलिसांचा जनजागृती उपक्रम
अंमली पदार्थमुक्त समाजासाठी ठाणे पोलिसांचा जनजागृती उपक्रम
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एन.के.टी. महाविद्यालयात विशेष कार्यक्रम
ठाणे : तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्तालय (परिमंडळ-१) आणि मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘सुसंगती सदा घडो’ या ब्रीदवाक्याला अनुसरून एन. के. टी. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करत सकारात्मक जीवनमूल्ये, सुसंस्कार आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला. तरुणाईने आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून व्यसनमुक्त जीवन जगावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण (भा.पो.से.), अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे (भा.पो.से.), पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ बाळासाहेब पाटील (भा.पो.से.) यांच्यासह परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
तसेच विश्वनाथ बिवलकर (संस्थापक, इगल ब्रिगेड फाउंडेशन) आणि डॉ. यशवंत सिंग सोळंकी (मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, सुरक्षित, सुदृढ आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.