मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले असून मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या जादा बसेससाठी प्रवाशांना ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळ तसेच MSRTC Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे आरक्षण करता येणार आहे.
तसेच किमान 40 प्रवाशांच्या गटासाठी 10 ऑगस्टपासून गट आरक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के भाडे सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के भाडे सवलत लागू राहणार असल्याची माहितीही देण्यात आली.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले असून प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.