औरंगाबादच्या प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडांच्या कत्तलीबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून या पुढे स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल करू नका, असे निर्देश या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
औरंगाबादमधील एमजीएम विद्यापीठातील प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरु आहे. मात्र त्यासाठी उद्यानातील झाडांची कत्तल केली जात असल्याने या प्रकरणी सुजाण नागरिकांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी औरंगाबाद महापालिकेने झाडे तोडण्याचे समर्थन करणारी कारणे शपथपत्रात दिली होती. मात्र याचिकाकर्त्याचे पालिकेच्या खुलाशावर समाधान झाले नाही आणि त्याने पुन्हा आक्षेप घेतला.
न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून चौकशी अहवाल सदर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि तीन वकिलांच्या समितीने या प्रकरणी चौकशी करून आपला अहवाल न्यायालयात सदर केला. त्या अहवालावर न्यायालयात झालेल्या युक्तिवादाच्या वेळी, नकाशात नमूद व्हीआयपी गेटची आवश्यकता काय ? असा सवाल न्यायालयाने औरंगाबाद महापालिकेला केला. तसेच उद्यानातील बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत अजिबात शंका नसून त्याभोवती उभारण्यात येणारे फूड प्लाझा आणि व्हीआयपी गेटमुळे स्मारकाच्या उद्देशाला बाधा निर्माण होत आहे असे सांगून यापुढे इथल्या एकही झाडाची कत्तल करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.