भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आले असल्याचे नितीन गडकरींनी म्हटले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईल असेही गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होतती असे गडकरी यांनी म्हटले आहे.
चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना अपघातात होणाऱ्या माराचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


