मुबंई- करोनाकाळात औषधांना असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन राज्यात ठिकठिकाणी नवी औषध दुकाने उभी राहिली. मात्र, करोना ओसरू लागल्यानंतर मागणी कमी झाल्याचा फटका या औषध दुकानांना बसू लागला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सरासरी ३५ टक्के औषध दुकाने बंद झाली आहेत.
राज्यात एकूण ९८ हजार ८३६ औषध दुकाने असून, करोनाच्या गेल्या तीन वर्षांत एकूण ४१ हजार ४५५ नवे औषध परवाने देण्यात आले होते. मात्र, यापैकी १२ हजार ६७२ परवाने दुकान मालकांनी प्रशासनाला परत केले आहेत. औषध दुकानांचा विशेषत: ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक परिसरात सुळसुळाट झाला होता. त्यामुळे व्यवसायाला फटका बसणे साहजिक होते. व्यवसाय मंदावल्याचे पाहून अनेकांनी परवाने परत करणे पसंत केले असावे, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी व्यक्त केले.

