🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l पुणे –
मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी गुडन्यूज आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा एक आठवडा लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी मान्सून मंगळवारी दाखल झाल्याची माहिती आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-देवस्थान-जमिनीची-खरेदी/
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करील अशी शक्यता आहे.
मान्सूनचे आगमन केरळमध्ये त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच होण्याची शक्यता आहे, असे पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. राज्यात सध्या उकाडा कमी झाला आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे. दोन दिवस काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे.