Maharashtra: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

0
12
अर्थसंकल्पीय अधिवेशन,
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई:-

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी आज सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-काँग्रेसच्या-बैठकीत-संघ/

अधिवेशनाच्या आधीच आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अंबदास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आज चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना देखील दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल झाले आहेत.महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मालाडमध्ये घटना घडली आहे, बदलापूरमध्ये घटना घडली, अमरावतीमध्येही घटना घडली, सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. हा वाद सोडवण्यासाठी एका बैठकीला मुख्यमंत्री जातात तर उपमुख्यमंत्री जात नाहीत. या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तर आज राज्यात परिस्थिती अशी आहे की, गुन्हेगारी करा, भ्रष्टाचार करा, अपमानजनक बोला, तुम्हाला लगेच वरची पदं मिळतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. अशी विचारणा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. तर मुख्यमंत्री विरोधकांबरोबर संवाद ठेवत नाहीत. सत्तेचा माज आणि माग्रुरी चेहऱ्यावर दिसून येत आहे. महाराष्ट्रची राजकीय संस्कृती आहे, ती बदलत चालली आहे. जोपर्यंत विरोधकांना त्यांचा जो मान आहे, तो दिला जात नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विधानसभेतील दारूण पराभवानंतर नाउमेद झालेल्या महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून समन्वयाचा पूर्ण अभाव दिसत आहे. तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही, यावर ते सत्तापक्षाची कितपत कोंडी करू शकतील, हे अवलंबून असेल. एकजूट दाखवण्याची विरोधकांना अधिवेशनात संधी असेल.

⭐विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही?

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. मविआतील कोणत्याही घटक पक्षाकडे २८ पेक्षा जास्त आमदार नाहीत. विरोधी पक्षनेते पदासाठी एक दशांश आमदार हे पद मागणाऱ्या पक्षाकडे असायला हवेत, असा नियम नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. तो मान्य झाला तर भास्कर जाधव यांना हे पद दिले जाऊ शकते. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे.

बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अधिवेशनात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कैद्याची शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक दबाव आणतील.

लाडक्या बहिणीसह विविध मुद्द्यांवर सरकारने यू टर्न घेतला आहे. त्यांच्या मंत्र्यांवर त्यांचेच आमदार गंभीर आरोप करत आहेत. सरकारला जाब विचारू.

विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे. गोंधळ हे कोणत्याही प्रश्नावर उत्तर असू शकत नाही. तेव्हा चर्चा करावी.
चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाज मंत्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here