रायगड- रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या पटलावर येत आहे. जगाच्या पाठीवरून येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक आपली हजेरी लावतात. पर्यटनामध्ये खास करून सागरी पर्यटनाला अधिक पसंती मिळते आहे. मंगळवारपासून जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी वॉटर टॅक्सी सेवेला प्रवासी आणि पर्यटकांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे सागरी पर्यटनाला आता वॉटर टॅक्सीचा आधार लाभणार आहे.
भारतातील पहिली 200 प्रवासी क्षमता असलेल्या हाय स्पीड वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज झाला. या वॉटर टॅक्सीची मुंबई डोमेस्टिक क्रुज टर्मिनल्स ते मांडवा पहिली सफर करण्यात आली. आजपासून या वॉटर टॅक्सीच्या रोज सहा फेर्या होणार असून सर्व सोयीसुविधांयुक्त आरामदायी आणि जलद प्रवासासाठी ही वॉटर टॅक्सी महत्वाची ठरणार आहे. 200 प्रवासी क्षमता असलेली नवीन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नयन इलेव्हन हाय स्पीड वॉटर टॅक्सी आहे. पहिल्याच दिवसापासून प्रवाशांनी या वॉटर टॅक्सीचं बुकिंग सुरू केलं आहे.
या वॉटर टॅक्सीमध्ये दोन क्लास आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास जिथे चारशे रुपये तिकीट असेल. तर, दुसरा आहे बिजनेस क्लास जिथे 450 रुपये तिकीट आकारले जाईल. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 140 जणांची आसनक्षमता आहे. तर, बिजनेस क्लासमध्ये 60 जणांची आसनक्षमता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सीटच्या खाली लाईफ जॅकेट्स देण्यात आले आहेत. आगीसारखी घटना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अंतर्गत स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी स्मोक डिटेक्टर लावले गेले आहेत


