नाशिक- 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनआज मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव,नाशिक येथे सुरु झाले आहे. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. हल्लीची मुले अधिक स्मार्ट झाली आहेत. प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला असते. ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती दाबून न ठेवता व्यक्त करावी. वाचलेले चांगले साहित्य लिहायला प्रेरणा देते. बालकांनी साहित्याशी दोस्ती करावी. त्यांनी पुस्तकाची संगत साहित्याची साथ सोडू नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी बोलताना केले.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला आहे. बालसाहित्य मेळाव्याची ही परंपरा यापुढील होणार्या साहित्य संमेलनात देखील कायम राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभावळकर यांनी दिली दिलखुलास उत्तरे देत त्यांनी चित्रपटात चिमणराव, बोक्या सात बंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे यासह केलेल्या विविध भूमिकाबाबतचा पट मुलांसमोर उभा केला. या बालसाहित्य मेळाव्यात लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर व जय गांगुर्डे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध गाण्याचे सादरीकरण यावेळी केले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, जयप्रकाश जातेगावकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ. शंकर बोर्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील, संतोष हुदलीकर, संजय करंजकर, विशाखा भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या 93 व्या संमेलनात जे उपक्रम राबविले गेले नाही असे नाविन्यपूर्ण उपक्रम या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राबविण्यात येत आहेत.