आपद्‌ग्रस्तांना पालकमंत्री परबांनी दिलेले मदतीचे धनादेश परत घेतले

0
84
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावी कोसळलेल्या दरडीखाली सापडून ८ घरांतील १७ लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर आपदग्रस्तांना पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या हस्ते दिलेले धनादेश प्रशासनाने दुसऱ्‍या दिवशी परत घेत आपद्ग्रस्तांची चेष्टा केल्याचे बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आयरे म्हणाले की, ता. २८ जुलै रोजी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी पोसरे गावाला भेट दिली. त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांचे धनादेश देण्यात आले. पण, दुसऱ्‍याच दिवशी तलाठी पाठवून ते धनादेश परत घेण्यात आले. त्यावेळी संबंधितांनी सांगितले की, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. आपद्ग्रस्त कुटुंबासोबत असे कृत्य करणे म्हणजे त्यांची कुचेष्टा आहे.

या घटनेची जिल्हाधिकाऱ्‍यांनी गंभीर दखल घेऊन त्वरित शासकीय मदत आपद्ग्रस्त कुटुंबांना द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पालकमंत्री परब यांनी केवळ फोटोसाठी मदत वितरण केल्याचा शो केल्याचा आरोपही आयरे यांनी या वेळी बोलताना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here