कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात बंधारा फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री बंधाऱ्यातून पाणी बाहेर येऊ लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. संपूर्ण रात्रं या ग्रामस्थांनी जागून काढली. मेघोली बंधारा काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या बंधाऱ्याला गळती लागली होती.
बंधारा फूटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून .अनेक जनावरे पाण्यासोबत वाहून गेली आहेत. या घटनेमुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्याच्या आऊटलेट शेजारी बंधारा फुटला अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. बंधारा फुटल्याने पाणी वेद गंगा नदीमध्ये गेले आहे. त्यामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे