प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवली- महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या माघी एकादशी उत्सवासाठी सिंधुदुर्गातून एसटीच्या १२५ गाड्या वारकऱ्यांसाठी सोडल्या जात होत्या यातून एसटीला तब्बल ४८ लाखाचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे; मात्र वारकऱ्यांनी पायीवारीबरोबरच खासगी बस गाड्यांचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे जिल्हातील वारकऱ्यांचा पंढरपूरचा प्रवास यंदा महागला आहे.
एसटी बससाठी केवळ ३० हजार रुपये इतके भाडे द्यावे लागत होते. यंदा खासगी बसला ५० हजार रुपये बुकिंग करण्यात आले. याचबरोबर छोट्या गाड्या, खासगी गाड्याही पंढरपूरकडे जात आहेत. प्रत्येक गावातून तसे नियोजन करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील वारकरी यंदाच्या पंढरपूर यात्रेत सहभागी होऊ शकत नाही. तरीही आम्ही आमच्या परीने सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. मात्र, आरटीओचा त्रास आम्हाला होता कामा नये, याची सरकारदरबारी काळजी घेणे गरजेचे आहे असं मत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे सचिव राजू राणे यांनी व्यक्त केल आहे.


