‘ऑपरेशन सागरबंधू’ अंतर्गत भारतीय लष्कराकडून श्रीलंकेत दुपदरी बेली पूल उभारणी
जाफनातील रस्ते संपर्क पूर्ववत
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सागरबंधू’ अंतर्गत कार्यरत इंजिनिअर टास्क फोर्सने चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या श्रीलंकेच्या जाफना प्रदेशात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या टास्क फोर्सने परंथन परिसरात १२० फूट लांबीचा अत्यंत महत्त्वाचा दुपदरी बेली पूल यशस्वीरित्या उभारून तुटलेला रस्ते संपर्क पूर्ववत केला आहे.
नवीनतम तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा २४ पूलतज्ज्ञांचा समावेश असलेल्या या विशेष पथकाने प्रतिकूल हवामान व कठीण परिस्थितीची पर्वा न करता दिवस-रात्र काम केले. अवघ्या दोन दिवसांत हा पूल उभारण्याची विक्रमी कामगिरी करत भारतीय लष्कराने आपली कार्यक्षमता आणि मानवतावादी बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या पुलाच्या उभारणीमुळे परंथन, किलिनोच्ची आणि मुल्लैतिवू या प्रमुख शहरांमधील रस्ते संपर्क पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या सुमारे २० दिवसांपासून हा संपर्क खंडित होता. आता या भागात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय मदत तसेच आपत्ती निवारण व पुनर्वसन कार्य वेगाने पोहोचवणे शक्य झाले आहे.
भारतीय लष्कराच्या या तातडीच्या व प्रभावी मदतीमुळे श्रीलंकेतील बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आपत्तीच्या काळात शेजारील देशांच्या मदतीसाठी भारत सदैव तत्पर असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.


