करावे गावातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनींसंदर्भातील विविध प्रश्नांवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. करावे आयलंड परिसरातील टी. एस. चाणक्यच्या मागील बाजूस असलेल्या शेतजमिनींवर वाढणारे मॅन्ग्रोव्ह, खारपाण्यामुळे होणारे नुकसान तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्या विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शेतजमिनींचे संरक्षण, जमीनधारकांना न्याय मिळवून देणे आणि भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. खारपाण्याच्या शिरकावामुळे शेतीयोग्य जमिनींचे होत असलेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
तसेच शेतजमिनी बंदिस्त करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात, संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्यास परवानगी द्यावी आणि बाधित जमीनधारकांना शासनाकडून योग्य लाभ व मोबदला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही बैठकीत मांडण्यात आली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीस माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.