चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हा अहवाल जाहीर करावा, अन्यथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मविआ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाने चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार, अहवाल सार्वजनिक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी सरकारकडे १३ वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे पवार यांनी म्हटले आहे.