९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील आर्मी बेस कॅम्प येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंदूर महारक्तदान’ अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात महाराष्ट्रातून आलेल्या पैलवानांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आर्मी बेस कॅम्पला भेट देऊन अभियानाच्या नियोजनाचा, व्यवस्थेचा आणि मुख्य कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या अभियानातून रक्तदानाबाबत जनजागृती होण्यासोबतच मानवसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र क्रीडासेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या मुख्य सोहळ्यास देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गेल्या वर्षी जम्मूमध्ये रक्तदानाचा उल्लेखनीय विक्रम करणारे महाराष्ट्रातील पैलवान यंदाही सलग दुसऱ्या वर्षी मानवतेच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.
क्रांती दिनाच्या निमित्ताने जवानांच्या भूमीत रक्तदानातून उभी राहिलेली ही सेवाभावी चळवळ समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.