
पंजाबी गायक करण औजलाची उदारता; मुंबईत दोन रिक्षाचालकांचे ₹२२ हजारांचे दंड भरले
मुंबई : लोकप्रिय पंजाबी गायक Karan Aujla याने मुंबईत दाखवलेल्या दयाळूपणाच्या कृतीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एका संगीत कार्यक्रमासाठी मुंबईत आलेल्या औजलाने प्रवासादरम्यान दोन ऑटो रिक्षाचालकांचे एकूण ₹२२ हजारांचे आरटीओ दंड स्वतः भरून त्यांना मोठी मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, करण औजला मुंबईत एका कार्यक्रमासाठी आला असताना तो ऑटो रिक्षातून प्रवास करत होता. दरम्यान, वाटेत वाहतूक तपासणीदरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षा थांबवून चालकाला त्याच्यावर जुना वाहतूक दंड असल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी चालकाला ₹१७ हजारांचा दंड भरावा, अन्यथा रिक्षा जप्त केली जाईल, असे सांगितले.
ही बाब लक्षात आल्यानंतर करण औजलाने अधिकाऱ्यांकडे दंडाची रक्कम विचारली आणि जागेवरच संपूर्ण दंड भरून टाकला. त्यामुळे संबंधित रिक्षाचालकाला मोठा दिलासा मिळाला. आनंदित झालेल्या चालकाने औजलाचे आभार मानत त्याला मिठी मारली.
याचदरम्यान दुसरा एक रिक्षाचालक तेथे आला आणि त्याच्यावरही ₹५ हजारांचा दंड असल्याचे सांगितले. औजलाने त्यालाही मदत करत त्याचा दंड भरला. अशा प्रकारे त्याने एकूण सुमारे ₹२२ हजारांचा दंड भरून दोन रिक्षाचालकांना मदतीचा हात दिला.
करण औजलाच्या या साध्या पण मोठ्या मनाच्या कृतीचे अनेकांनी कौतुक केले असून, कलाकाराने दाखवलेली ही मानवतावादी भूमिका समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

