१,२०० मिमी क्षमतेच्या कच्च्या पाण्याच्या पाईपलाईनच्या इनलेट चेंबरमध्ये गळती आढळून आल्याने पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) जुना पार्वती जलशुद्धीकरण प्रकल्प तात्पुरता बंद केला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये १ आणि २ ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
महापालिकेकडून गळती दुरुस्त करण्याचे आपत्कालीन काम युद्धपातळीवर सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुरुस्ती पूर्ण होताच जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
या कामामुळे पेठ परिसर, शिवाजीनगर, एरंडवणे, औंध, बोपोडी, खडकी, दापोडी, रेंज हिल्स, खडकी कॅन्टोन्मेंट, संगमवाडी, मॉडेल कॉलनी, गोखलेनगर, सेनापती बापट रस्ता, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बावधन तसेच संबंधित जलवाहिनी नेटवर्कशी जोडलेल्या इतर परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे, त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कामामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल महापालिकेने खेद व्यक्त केला आहे.