प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले
मुंबई :
प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि ज्ञानसाधनेला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मराठी भाषेवरील निखळ प्रेम, सखोल अभ्यास आणि भाषेच्या संवर्धनासाठी केलेले कार्य यामुळे प्रा. शेख यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रात त्यांनी प्रदीर्घ काळ संशोधन केले. अभिजात मराठी भाषेसोबतच अन्य भारतीय भाषांचाही त्यांनी संशोधक म्हणून अभ्यास केला. मराठी भाषा, व्याकरण, शुद्धलेखन आणि भाषासौंदर्य यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
सहज, सोप्या आणि प्रभावी शैलीतून त्यांनी मराठी भाषेची समृद्धी असंख्य वाचकांपर्यंत पोहोचवली. भाषा शिक्षकाने आपल्या भाषेवर किती निखळ आणि प्रांजळ प्रेम करावे, याचे त्या मूर्तीमंत उदाहरण ठरल्या.
प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी मुस्लिम साहित्य चळवळीला बळ देण्यासोबतच स्त्रीवादी विचार, सामाजिक समता आणि सामाजिक जाणीव रुजवण्यासाठीही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यातून भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून समाजाला जोडणारी आणि संवेदनशील बनवणारी शक्ती आहे, हा विचार अधोरेखित झाला.
त्यांचे विचार, लेखन आणि मायमराठीवरील निस्सीम प्रेम मराठी भाषाप्रेमींच्या सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.
प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


