मुंबई, दि. १ : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांचा पावसाचा इशारा जारी केला असून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२ जुलै रोजी विशेषतः उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी, घाट परिसर आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
३ आणि ४ जुलै रोजीही कोकण किनारपट्टीवरील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील इतर बहुतांश भागांमध्ये यलो अलर्ट लागू असून काही जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने नागरिकांना जोरदार पावसाच्या काळात नदी-नाले, धबधबे आणि समुद्रकिनारी जाणे टाळण्याचा, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.